Breaking News

कपॅसिटर टाळेल, रोहित्र अन् कृषीपंपाचे नुकसान ; शेतकऱ्यांना कपॅसिटर वापरण्याचे महावितरणकडून आवाहन

Capacitor will prevent damage to Rohitra and agricultural pumps; MSEDCL appeals to farmers to use capacitors
        बारामती  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  अगदी सहज व चार-पाचशे रुपयांत मिळणाऱ्या एका कपॅसिटरचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी केला तर हेच कपॅसिटर त्यांच्या कृषीपंपाला व विद्युत रोहित्राला जळण्यापासून वाचवू शकते. शिवाय कपॅसिटर वापरल्यामुळे रोहित्रावर येणारा दाब सुमारे २५ टक्क्यांपर्यंत कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात स्वत:ची गैरसोय टाळण्यासाठी योग्य क्षमतेचे कपॅसिटर वापरावे असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी केले आहे.

            बारामती परिमंडलात गतवर्षी रोहित्र जळण्याचे सरासरी प्रमाण ७.४७ टक्के आहे. तब्बल ६२६६ रोहित्र गतवर्षी नादुरुस्त झाले होते. तर यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे चालू रब्बी हंगामात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारणपणे एक जळालेले/नादुरुस्त झालेले रोहित्र दुरुस्त करण्यासाठी किमान २४ हजार रुपयांचा खर्च होतो. त्याच्या क्षमतेनुसार ही किंमत आणखी वाढते. शिवाय ते बदलेपर्यंत महावितरणचा महसूल बुडतो. दुसरीकडे शेतकऱ्यांचेही नुकसान होते. पिके करपतात. उत्पादनात घट होते. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होणे महावितरण व शेतकरी दोघांनाही परवडणारे नाही.

            कपॅसिटर वापराचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यासाठी स्वत: मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे, अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता श्री. गणेश लटपटे व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी भिगवण उपकेंद्रासमोर असलेल्या उजनी धरणाच्या बॅक वॉटरवर चालू असलेल्या कृषीपंपावर याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवून ते वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी केलेल्या प्रात्यक्षिकावेळी कपॅसिटर शिवाय लागणारा करंट कपॅसिटरच्या वापरामुळे साधारणपणे २९ टक्‍क्यांनी कमी लागला. रोहित्र व कृषीपंप वाचवायचे असतील तर कपॅसिटर हाच एकमेव उपाय आहे. कपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषीपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते.

No comments