Breaking News

शेतीसाठी मिळाले बळ

        मी सातारा जिल्ह्यातील गोजेगाव मध्ये राहणारा एक लहान शेतकरी आहे.. माझं नाव रमेश लक्ष्मण घोरपडे… इतर शेतकऱ्यांप्रमाणे मी सुद्धा गोजेगावातील एका सहकारी सोसायटीचं एक लाखाचं कर्ज घेतलं होतं. शेतीतील अल्प उत्पन्न अन् कर्ज यांचा मेळ घालता घालता मला घर चालवणं कठिण झालं होत.. कर्ज कधी फिटेल याच चिंतेत असायचो.

        त्यातच मला राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेबाबत कळलं आणि तातडीने बँकेकडं चौकशी केली. बँकेनं माझं नाव त्यांच्या यादीत घेतल्याचं आणि बाकीचं काम ऑनलाईन होणार असल्याचं सांगितलं… कम्प्युटरवरच सगळं होत असल्यान् कागदपत्र घेऊन फिरायचा त्रास बी वाचला… ही प्रक्रिया सुरू असतानाच लॉकडाऊन सुरू झालं अन् मला परत चिंता लागली की आपलं कर्ज फिटंल का… पण एक दिवस माझं कर्ज फिटल्याचं कळलं आणि जीवात जीव आला. एवढ्या लवकर कर्ज माफ होईल असं वाटलं पण नव्हतं… माझ्याप्रमाणेच गावातील अनेकांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केल्याचं कळलं.. माझी पैशाची चिंता कमी झाल्यानं मला तर बरं वाटलच त्याचप्रमाणे माझ्या कुटुबांच्या चेहऱ्यावर पण आनंद दिसला.

        महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरलं कर्ज कमी झालं. त्यामुळे पुढच्या पिकासाठी पीक कर्ज घेण्याचा मार्गही मोकळा झाला. त्यामुळं आणखी उत्साहानं शेताच्या कामाकडे आणखीन व्यवस्थित लक्ष देऊ लागलो. सरकारची साथ मिळाल्यानं शेती पिकवायला अधिक जोम आला… त्यातच आता मुलगाही माझ्याबरुबर शेताकडं येऊ लागला.

        शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणाऱ्या सरकारचे मी आभार मानतो.. आता अधिक कष्ट करून शेत हिरवंगार करीन…

- रमेश लक्ष्मण घोरपडे, गोजेगाव, ता.सातारा

No comments