Breaking News

जातीपातीच्या पुढे जाऊन माणूस म्हणून समतेचे विचार आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

It is necessary to go beyond caste and think of equality as a human being - Chief Minister Uddhav Thackeray

        मुंबई - : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला पुढे नेतांना जातपात विरहीत आणि माणूस म्हणून सामाजिक समतेला मजबूत करणारा विचार ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांनी आपल्या पुस्तकातून मांडला असल्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे म्हणाले.

        लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मधू कांबळे यांच्या ‘समतेशी करार’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राजकुमार सागर, श्री.गौतमीपूत्र कांबळे, श्रीमती सुहासिनी कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

        मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, 75 वर्षे पुर्ण केल्यानंतर स्वातंत्र्याचे किरण आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवू शकलो का याचा विचार करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यभर याच भूमिकेतून संघर्ष केला. सामाजिक समानतेसाठी कृतीशील लढा दिला. आज या पुस्तकाच्या माध्यमातून श्री.कांबळे यांनी हीच भूमिका पुन्हा एकदा नव्याने जोरकसपणे मांडली आहे,  ही निश्चितच कौतुकाची आणि धाडसी  बाब असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांनी जे सामाजिक समतेचे विचार मांडले ते आजही आपल्या सोबतच आहेत फक्त त्यांनी आपल्याला सामाजिक समतेचे हे देणं दिले आहे हे आपण विसरतो आहोत. त्याचे स्मरण हे लिखाण करून देते. आपण मूलत: माणूस आहोत. त्यानंतर आपल्याला जातपात आणि धर्म चिकटतो. ते मिरवतांना आपण ज्या गोष्टी जपतो त्या बरोबर आहेत की चुकीच्या असा मनात जेंव्हा संभ्रम निर्माण होतो त्यावेळी ज्या गोष्टी आपल्याला मार्ग दाखवतात त्यात हे पुस्तकही वाटाड्याचे काम करील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

        महाराष्ट्राला वैचारिक आणि सामाजिक सुधारणेची मोठी परंपरा लाभली असून आपले संविधान ही समतेचे मूल्य सांगते. आरक्षण, जातीय व्यवस्था आणि सामाजिक विकासाचा विचार करतांना लोकशाही मुल्यांची जपणूक महत्त्वाची ठरत असल्याचे पुस्तकाचे लेखक मधू कांबळे यांनी मनोगतात सांगितले. त्यांनी पुस्तक लिहिण्यामागची भूमिकाही याच दृष्टीकोनातून विशद केली.

        प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

No comments