पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करण्यात खा. रणजितसिंह यांनी लक्ष घालावे - अमित शहा
केंद्राने पूरग्रस्त भागाला तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २४ जुलै - महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती तसेच सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थिती या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली.
भेटी प्रसंगी खासदार रणजितसिंह यांनी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती व अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रावर आलेली पूर परिस्थितीची माहिती देऊन, केंद्र शासनाने राज्यातील पूरग्रस्त भागाला तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच ज्या लोकांचे प्राण यामध्ये गेलेले आहेत, त्यांना तात्काळ मदत उपलब्ध व्हावी अशी मागणी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांकडे केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी याबाबत राज्याला सर्व सहकार्य केंद्र शासन करेल अशी ग्वाही दिली.
चर्चेदरम्यान महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर व भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे ताकद तळागाळापर्यंत वाढली पाहिजे, पक्ष संघटन मजबूत झाले पाहिजे, यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न करावेत असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी दिले.
यापुढील काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असे हे संकेत शहा यांनी दिले. पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपुर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांना बरोबर घेऊन निंबाळकर यांनी जी रणनीती आखली होती, त्याबद्दल ही दोन्ही नेत्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले तसेच अनेक राजकीय ,व मतदारसंघातील अनेक विषयावर चर्चा होऊन या मतदारसंघांमध्ये या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी एखादा मोठा उद्योग उभा राहायला पाहिजे यासाठीही वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना ही विनंती करण्यात आली.
No comments