Breaking News

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शंभूराज देसाई यांनी केला तारळे,चाफळ व मोरणा विभागाचा दौरा

Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai visited Tarle, Chafal and Morna divisions to review the damage caused by heavy rains.

    सातारा  (जिमाका) : गेली दोन तीन दिवस पाटण तालुक्यामध्ये पडलेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली.

   यावेळी  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर, शिवदौलत बँकचे संचालक अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे, विकास जाधव, भरत साळूंखे, चंद्रकांत पाटील, डी.वाय.पाटील,गणेश भिसे, किसन गालवे यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

              गेल्या दोन तीन दिवसांपासून पाटण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणांत ढगफुटीसदृश्य पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेसह शेत जमीनी, पिके यांचे मोठे नुकसान झाले. पाटण तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढयांसह नद्यांना पुराचे पाणी  येऊन पोहोच रस्ते, साकव पूल, शेत जमीनी यांचे मोठे नुकसान झाले असून गावपोहोच रस्त्यांवर मोठया प्रमाणांत दरडी पडण्यासह साकव पूल वाहून गेल्याने तसेच रस्ते खचल्याने डोंगरी व दुर्गम भागातील गावांचे दळण वळण ठप्प झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागामध्ये असलेल्या गावांचे आसपास भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या असल्याने डोंगराचा भाग व कडा कोसळण्याची  भिती असलेल्या गावांतील ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन त्यांना आवश्यक त्या सुविधा तातडीने पुरविणे गरजेचे असल्याने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज तारळे, चाफळ व मोरणा विभागाचा दौरा करुन पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली. पाटण तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोठया प्रमाणांत पडलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार  पावसामुळे विशेषत: डोंगरी व दुर्गम भागातील गावे, वाडया वस्त्यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झालेले असून काही गावांवर डोंगराचा भाग कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर काही गावांतील घरे खचण्यास सुरुवात झाली असल्याने धोकादायक स्थितीमध्ये असलेल्या गावांमधील नागरिकांना प्रथमत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले असून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलेल्या नागरीकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना शासकीय यंत्रणांना दिल्या आहेत. दरम्यान अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने मदत कार्यामध्ये अनेक अडचणी येत असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनींचे, पिकांचे, घरांचे तसेच रस्ते, साकव पूल, नळ पाणी पुरवठा योजना यांसारख्या सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे हे पाऊस कमी आल्यानंतर लगेचच करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांना करण्यात आल्या असल्याचे सांगत मुसळधार पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झालेल्या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असल्याने नागरीकांनी आपला जीव धोक्यात घालून या मार्गावरुन प्रवास करु नये असे आवाहनही  शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.

भूस्खलन होऊन बाधित झालेल्या मिरगाव (कामरगावं) येथील ग्रामस्थांना दिली तातडीची मदत

            पाटण तालुक्यात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या कोयना विभागातील मिरगाव (कामरगाव) येथील बाधित सर्व कुटुंबांना एन.डी.आर.एफ.टिमच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या स्थलांतरित कुटुंबांना एक महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य तसेच अन्नधान्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच घर पडझडीमुळे बाधीत झालेल्या 500 कुटुंबांना सध्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी ,ब्लँकेट, सतरंजी इत्यादींची व्यवस्था शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

No comments