नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलकांचा आक्रोश
फलटण गंधवार्ता (वृत्तसेवा) दि.२६ - फलटण शहरात डेंग्यू रोगाने थैमान घातलेले असतानाच, शहरात डेंग्यूने युवकाचा बळी घेतल्यामुळे डेंग्यू मृतांची संख्या दोन झालेली आहे, या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठेतील नागरिकांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या नेतृत्वाखाली नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढून निषेध नोंदवला व मृत युवकाच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व युवकाच्या आईला कंत्राटी कर्मचारी म्हणून कामावर घेण्यात यावी. तसेच मंगळवार पेठेत स्वच्छता करून फॉगिंग मशीन द्वारे फवारणी करण्यात यावी अशा मागण्या मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांच्याकडे करण्यात आल्या.
मंगळवार पेठेतून निषेध नोंदवत मोर्चा फलटण नगर परिषदेच्या समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सचिन अहिवळे यांनी नगरपालिका प्रशासनास धारेवर धरत, अस्वच्छतेच्या तक्रारी केल्यातरी प्रशासन लक्ष देत नसल्याचे सांगतानाच लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगितले. नगरपालिका प्रशासनाने त्यांच्या कार्यप्रणालीत बदल करावा व स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करावे, पुन्हा फलटण शहरात किरण सारखा मृत्यू होऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन कामगार संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे यांनी यावेळी केले. शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजना व इतर योजना फक्त नावालाच आहेत, हॉस्पिटल सुरवातीस गरीब व गरजू व्यक्तींना या योजना देत नाहीत. त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, व नंतर योजना देतात. त्यामुळे रुग्णास वेळेवर उपचार मिळत नाही. खरे गुन्हेगार हे डॉक्टरच आहेत त्यामुळे आता इथून पुढे मोर्चा प्रत्यक्ष हॉस्पिटलच्या दारातच न्यावा लागणार असल्याचा इशारा हरीष उर्फ आप्पा काकडे यांनी दिला. मंगळवार पेठेत ठिकठिकाणी गटारे तुंबली आहेत, काही ठिकाणी रस्त्याच्यावर गटारे बांधली गेली आहेत, त्यामुळे पाणी साठत असल्याचे निदर्शनास आणून देत, या भागांची दुरुस्ती करून त्वरित स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी ॲड. अनिकेत अहिवळे यांनी केली. तक्रारी दिल्यानंतरच नगरपालिका लक्ष देत आहे आणि जे लोक तक्रारी करत नाहीत तिथं घाणीचे साम्राज्य पसरत आहे, तरी नगरपालिकेने सर्व ठिकाणांची स्वच्छता करावी अशी मागणी विक्रम काकडे, कपिल काकडे यांनी केली.
मंगळवार पेठ फलटण येथील किरण राजू काकडे वय २२, यास डेंग्यू आजाराची लागण झाली होती. त्याच्यावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. किरणची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यास पुणे येथे पाठवण्यात आले. काकडे यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मंगळवार पेठेतील नागरिकांनी लोकवर्गणी काढून पैसे जमा केले व किरणच्या उपचारासाठी पाठवले , परंतु उपचारात यश आले नाही व दि . २४ सप्टेंबर २०२२ रोजी पुणे येथे उपचारादरम्यान किरणचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. किरण काकडे च्या मृत्यूस नगरपालिका जबाबदार आहे . किरण काकडे याच्या घराच्या अवतीभवती अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून , वेळेत उपाययोजना केल्या असत्या तर युवकाचा जीव वाचला असता , त्यामुळे मंगळवार पेठेतील नागरिकांनी, डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या नेतृत्वाखाली नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात दि . २६ सप्टेंबर रोजी मोर्चा काढला.
मोर्चा काढल्यानंतर मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देऊन तात्काळ मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,फलटण नगर परिषद फलटण च्या हलगर्जी पणामुळे एका दलित बौद्ध तरुणाचा मृत्यू झाला . त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूप बिकट आहे .त्यामुळे त्याच्या कुटुंबाला आपल्या नगरपालिके कडून ५ लाख रुपये आणि त्याच्या आईला कंत्राटी बेसवर शिपाई म्हणून नेमणूक करण्यात यावी . त्या संदर्भात विशेषबाब म्हणून ऑर्डर काढण्यात यावी आणि पुन्हा किरण काकडे सारखा एखादा तरुण या साथीच्या आजारामुळे मृत्यू होणार नाही, त्यासाठी आपल्या नगर पालिकेकडून संपूर्ण मंगळवार पेठ येथे डेंग्यू रोखण्यासाठी उपाय योजना राबवण्यात यावी. अन्यथा या पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, किरण काकडे याचे कुटुंबीय व विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याधिकारी सकारात्मकयुवकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत मिळवण्याबाबत आपण सकारात्मक प्रयत्न करू, तसेच मृत युवकाच्या आईस रोजगार मिळावा या संदर्भात आपण काही ना काही मार्ग काढून तिला रोजगार देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिले. मंगळवार पेठेतील स्वच्छतेबाबत माझे वैयक्तिक लक्ष असतेच. तरीही येत्या दोन-चार दिवसात किंवा २ ऑक्टोबर रोजी मंगळवार पेठेत मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबवून सर्व स्वच्छता करण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिले.
No comments