अतिक्रमण हटाव मोहिम सर्व कायदेशीर बाबी व प्रक्रिया यांचा अवलंब करुन करावी - जिल्हाधिकारी
![]() |
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन देताना ॲड. नरसिंह निकम, अशोकराव जाधव, अमिर शेख व अन्य |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २ डिसेंबर : फलटण शहरात सुरु करण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहिम ही सर्व कायदेशीर बाबी व प्रक्रिया यांचा अवलंब करुन करावी. यानुषंगाने भविष्यात कोणतीही प्रशासकीय अडचण उदभवणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्याचे निर्देश फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी व फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकारी, सातारा कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
फलटण शहरात सुरु असलेली अतिक्रमण हटाव मोहिम बेकायदेशीर आहे व त्यात गरीब व धनदांडगे असा भेदभाव केला जात असल्याच्या विरोधात आज फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेवून, त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिम ही, सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन राबवावी. त्याबाबत काही त्रुटी असतील तर ही मोहिम तात्पुरती थांबवावी व संबंधित त्रुटिंची पुर्तता करुन, ती पुन्हा सुरु करण्यात येईल व त्याबाबतचे निर्देश फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात येतील असे अश्वासन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले.
चर्चा करताना सदर अतिक्रमण मोहिम राबविताना नगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या नाहीत, अतिक्रमणे काढून घेण्यास मुदत देण्यात आली नाही. अतिक्रमण मोहिम राबविताना टाऊन प्लॅनिंगनुसार सर्व्हे करण्यात आला नाही. अतिक्रमण राबविताना आत असलेल्या मालासह टपऱ्या, हातगाड्यांवर जेसीबी चालविण्यात आला. गरीबांची अतिक्रमणे हटविली परंतू धनदांडग्यांच्या अतिक्रमणांना मात्र हात देखील लावला नाही. अतिक्रमण मोहिमेस आमचा विरोध नाही. सर्वांची एकत्रीत बैठक आपल्या मार्गदर्शानाखाली बोलवा सर्व्हेनंतर जी अतिक्रमणे ठरतील मग ती कोणाचीही असोत ती काढण्यात यावीत अशी मागणी ॲड. नरसिंह निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
या नंतर जिल्हाधिकाऱ्यांना ॲड नरसिंह निकम यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, वसीम मणेर, अमिर शेख, रोहित राऊत आदींसह हातगाडे धारक, टपरी धारक, फळ विक्रेते, लघु व्यावसायिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
No comments