वाखरी शाळा बांधण्याचा प्रयत्न केला मात्र वनखात्याने गुन्हे दाखल केले ; जागा उपलब्ध झाली तर नवीन इमारत बांधू - सचिन सूर्यवंशी (बेडके)
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - छत्रपती शिवाजी हायस्कूल,वाखरी शाळेची इमारत दुरुस्ती करण्यासाठी संस्था तयार आहे, परंतु शंकेची जागा ही वन विभागाच्या मालकीची असून वन विभाग दुरुस्ती करू देत नाही. पाठीमागे आम्ही शाळा दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र वन खात्याने आमच्यावर गुन्हे दाखल केले व बांधकाम साहित्य जप्त केले. वाखरी गावात शाळा बांधण्यासाठी ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थानी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही नवीन इमारत उभारण्यास तयार आहे. शाळेच्या दुरावस्थेबाबत, आम्ही शिक्षण विभाग तसेच वन विभागाला कळवले असून, दुरुस्ती करण्याची मागणी केली असल्याचे सांगतानाच वाखरी शाळेबाबत व्यक्तिगत स्वार्थातून आरोप होत असल्याचे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले.
वाखरी ता. फलटण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेची इमारत जुनी झाल्याने इमारतीची पडझड झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करताना संस्थेचे सचिव सचिन सुर्यवंशी(बेडके) बोलत होते.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी ही संस्था फलटण तालुक्यात नावाजलेली संस्था असून, वाखरी येथील शाळेची इमारत ग्रामस्थांच्या सहकार्याने १९६२ साली उभारलेली आहे.सध्या शाळेची इमारत जेथे उभी आहे ती जागा वनविभागाची असुन, तेथे नवीन इमारत उभी करण्यासाठी वनविभाग परवानगी देत नाही. वन विभागाची जागे संबंधी अडचण असल्या कारणाने आम्हास तेथे सर्व सोईंनीयुक्त नविन इमारत उभारने किंवा आहे त्या इमारतीची दुरुस्ती करणे इत्यादी गोष्टी जिकरीच्या होऊन बसल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक बरोबरच मुलभूत अशा स्वच्छतागृह, व्यायामशाळा, वाचनालय, प्रयोगशाळा आदी प्रकारच्या सुध्दा सुविधा उपलब्ध करुन देण्यास असक्षम ठरत आहोत, असे सचिन सुर्यवंशी (बेडके) यांनी सांगितले.
यापूर्वी आम्ही २०१९ मध्ये इमारत दुरुस्तीचा आणि नवीन खोल्या बांधण्याचां प्रयत्न केला मात्र त्यावेळी वनविभागाने आम्हां सर्वांवर गुन्हे दाखल केले होते. शाळेसाठी ग्रामपंचायतीने किंवा कोणी खाजगी व्यक्तीने जागा दिल्यास आम्ही त्या जागेवर नवीन इमारत उभारण्यात तयार आहोत. विद्यार्थांच्या हितासाठी गावपातळीवर सर्वांनी एकत्र येऊन जागेचा तिढा सोडवावा. आम्ही त्वरित इमारत बंधू असे सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी सातारा, उप वनसंरक्षक, सातारा इत्यादी शासकिय कार्यालयांकडे आमच्या संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला असून, त्याचा सतत कागदोपत्री व समक्ष पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सचिन सुर्यवंशी ( बेडके) यांनी सांगितले.
No comments