नीरा नदी पात्रात पाणी सोडण्याची शक्यता, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
फलटण - फलटण तालुक्यात अद्याप पाऊस झाला नसला तरी फलटण तालुक्याला पाणी पुरवठा करणारी धरणे भरली असून येत्या २/३ दिवसात धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास नीरा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असून नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नीरा - देवघर धरण दि. ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ९४ %, वीर धरण ८४ % भरले आहे. असाच पाऊस आगामी २-३ दिवस सुरु राहिला तर नीरा - देवघर धरणातून विसर्ग सुरु करावा लागेल. तो विसर्ग थेट वीर धरणात येत असल्याने वीर धरण भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी वीर धरणातून नीरा नदी पात्रात पाणी सोडावे लागू शकते अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली आहे.
वीर धरणातून पाणी सोडण्यात येण्याच्या पार्श्वभूमीवर नीरानदी पात्रात कुठल्याही विभागाचे काम सुरु असेल तर त्या विभागाने बांधकाम साहित्य व कामगार यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. तसेच नीरा नदीच्या काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा असे आदेश तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
No comments