विद्यार्थ्यांनी मोबाईल संस्कृती सोडून क्रीडा संस्कृती जोपासावी - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
![]() |
विध्यार्थी व खेळाडूंना मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - बदलत्या जीवनशैलीमुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना अनेक आजार जडत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व द्यावे व तंदुरुस्त राहावे. विद्यार्थी व खेळाडूंनी मोबाईल संस्कृती सोडून, क्रीडा संस्कृती जोपासावी असे आवाहन पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थी व खेळाडूंना केले.
![]() |
खेळाडूंसमवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवाजीराव घोरपडे, महादेवराव माने, शिरीश वेलणकर, प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम,उपप्राचार्य डॉ. दीक्षित सर, उपप्राचार्य संजय वेदपाठक सर |
दिनांक ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी मुधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामार्फत दोन दिवसीय पावसाळी आंतरकूल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे , सदस्य महादेवराव माने, शिरीश वेलणकर , मुधोजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. दीक्षित सर , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संजय वेदपाठक सर उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे मार्गदर्शन करताना म्हणाले की, व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थ्यांनी यश अपयशाचा विचार न करता भरपूर खेळून स्वतःला तंदुरुस्त ठेवावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. वेदपाठक यांनी खेळाचे फायदे सांगताना निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते तसेच खेळामुळे आनंद , उत्साह , शक्ती , कौशल्य विकसित होतात तसेच बौद्धिकता , भावनिक , सामाजिक विकास होतो , यश अपयश पचवण्याची क्षमता निर्माण होऊन जीवनात शिस्त लागते असे सांगितले. तसेच पावसाळी आंतर कूल क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून हिवाळी क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिवाजीराव घोरपडे यांनी आपल्या देशात अजूनही क्रीडा संस्कृती रुजलेली नाही व ती रुजवायचे काम मुधोजी कनिष्ठ महाविद्यातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक करत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत रोपे भेट देऊन करण्यात आले व नंतर मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.पावसाळी आंतरकूल क्रीडा स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री. सुहास कदम , श्री. अमोल कर्चे , श्री. अविनाश गंगतीरे यांनी काम पाहिले.
पावसाळी आंतरकूल क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा प्रेमी तसेच कनिष्ठ विभागाचे सर्व प्राध्यापक , प्राध्यापिका , अकरावी व बारावी मधील कला , वाणिज्य व विज्ञान विभागात शिकत असणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप शिंदे व सौ. नीलम देशमुख यांनी केले व आभार प्रा. तायप्पा शेंडगे यांनी मानले.
No comments