Breaking News

गौरी आगमनापूर्वी सर्व पात्र लाभार्थींपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवा

Deliver happiness ration to all deserving beneficiaries before Gauri's arrival

    सातारा - राज्यातील गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 48% पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरित झाला असून उर्वरित सर्व पात्र लाभार्थींपर्यंत गौरी आगमनापूर्वी आनंदाचा शिधा संच पोहोचवावेत. त्यासाठी यंत्रणेने आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थींना गौरी गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजीन्नस समाविष्ट असलेला संच अर्थात आनंदाचा शिधा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याहस्ते वितरित करण्यात आला. 

    देगाव रोड, एमआयडीसी कोडोली, सातारा येथील एम.बी. पिंगळे यांच्या रास्त भाव धान्य दुकानात आयोजित कार्यक्रम प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार राजेश जाधव, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, सरपंच सतीश माने, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री. चंद्रकांत जाधव, श्री. आनंदराव कणसे, एम.बी. पिंगळे यांच्यासह लाभार्थीं, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील गोरगरीब , सर्वसामान्य नागरिकांना आनंदात आणि उत्साहात सण साजरे करता यावेत यासाठी शासन आनंदाचा शिधा योजना राबवत आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे चार लाख लाभार्थींना आनंदाचा शिधा संचाचे वितरण करण्यात येत आहे . जिल्ह्यात गत आठवड्यात तीन दिवस इंटरनेट सुविधा बंद असल्याने आनंदाचा शिधा संच वितरणाला काहीसा विलंब झाला असला तरी गौरी आगमनापूर्वी हा शिधा सर्व पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचला पाहिजे त्यासाठी यंत्रणेने आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

    सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रिकांसाठी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधा जिन्नसांचा समावेश असलेला एक शिधाजींन्नस संच प्रति शिधापत्रिका धारकास रुपये शंभर या दराने वितरित करण्यात येत आहे‌ . सातारा जिल्ह्यामध्ये 3 लाख 88 हजार 907 इतक्या शिधापत्रिका धारकांना जिन्नस वाटप करण्यात येणार असून आज अखेर 1लाख 88 हजार 523 इतक्या लाभार्थींना शिधाजीन्नस वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थींना वितरणाचे काम सुरू आहे.

No comments