...आता माढा मतदार संघाला दुष्काळ जाणवणार नाही ; सरकारचे आभार - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.७ - निरा देवघर प्रकल्पाला फायनल मंजुरी मिळाल्याबद्दल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आभार मानले.
माढा लोकसभा मतदारसंघातील महत्वाचा असणारा निरा देवघर प्रकल्प, गेली अनेक वर्ष रखडला गेला होता, निरा देवघर चे पाणी अनेक वर्ष मतदारसंघात मिळत नव्हते, पाणी कायम स्वरूपी देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने विशेषता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चय केला होता, त्यानुसार प्रकल्पाचे टेंडरही निघाले. या प्रकल्पाला निधी कमी पडू नये म्हणून केंद्र सरकारने ६० टक्के वाटा उचलण्याचं ठरवलं आणि दि.६ डिसेंबर रोजी त्याची फायनल मंजुरी दिली असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले.
जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, त्यांनी महाराष्ट्रात येऊन भोर ते पंढरपूर पर्यंत नीरादेवघर प्रकल्पाची पाहणी केली, आणि पंढरपूर येथे जनतेला दिलेला शब्द त्यांनी आज पूर्ण केला. माढा मतदारसंघातील फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर हे तालुके दुष्काळ ग्रस्त आहेत, परंतु २०२५ पर्यंत निरा देवघर प्रकल्पामुळे माढा लोकसभा मतदारसंघात दुष्काळ जाणवणार नाही, आज मला मनापासून आनंद होत आहे, कारण माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी सुरू केलेल्या संघर्षाला आज वीस वर्षानंतर यश येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे तसेच राज्य सरकारचे, मी माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून जनतेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो.
No comments