महिला तक्रारदारांपर्यंत पोलीस दहा मिनिटात पोहोचतील अशी यंत्रणा कार्यान्वित करा- पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि.१०:-पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी दहा मिनिटाच्या आत त्या तक्रारदार महिले पर्यंत पोहोचेल अशी यंत्रणा पोलीस विभागाने कारणीत करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पाटण येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.
महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र दूरध्वनी कार्यरत करण्यात यावा, अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या दूरध्वनी क्रमांकाची माहिती शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस मध्ये देण्यात यावी. तक्रार आल्यास पोलिसांनी दहा मिनिटात तक्रारदारापर्यंत पोहोचावे. तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव पोलीस विभागाकडून गोपनीय ठेवण्यात येईल. ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे , त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.
महिलांच्या तक्रारींचे निवारण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी देण्यात येईल. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी दिला जाईल. असेही ते यावेळी म्हणाले. या बैठकीला पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
No comments