श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब अध्यात्मिक ओढा असणारे व्यक्तिमत्व- डॉ. सदानंद मोरे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२० - जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून एका सुसंस्कृत तथापि आधुनिक विचार कृतीत आणणाऱ्या श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब (प्राचार्य विश्वासराव देशमुख लिखित) चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करत असताना मला मनस्वी आनंद होत असल्याचे डॉ. सदानंद मोरे यांनी सांगितले.
मालोजीराजे प्रतिष्ठान व मुधोजी महाविद्यालय फलटण यांनी आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या संयुक्त कार्यक्रमांमध्ये श्रीमंत लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन प्रसंगी डॉ. सदानंद मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व चरित्र ग्रंथाचे लेखक प्राचार्य विश्वासराव देशमुख उपस्थित होते.
डॉ मोरे यांनी पुढे बोलताना आपल्या जीवनातील प्रसंग सांगताना असे म्हटले की, राणीसाहेब एकदा देहूला आल्या होत्या, तेव्हा दहा वर्षाच्या मुलाचे प्रवचन सुरू होते, त्यांनी ते संपूर्ण प्रवचन ऐकले व त्या मुलाला त्यांनी बोलावून घेतले व विचारपूस केली व त्यांनी पुढे त्याला फलटणला बोलवून घेतले, तो मीच सदानंद मोरे, नऊ ते दहा वर्षाचा प्रवचनकार होतो. त्यावेळी पासून राणीसाहेबांनी मला जवळ केले व मला त्यांनी राजाश्रयही दिला, मला प्रोत्साहन दिले. राणीसाहेबांच्या जीवनातला एक अनुभव सांगताना, त्या किती आध्यात्मिक होत्या, याचा दाखला दिला. राणीसाहेब विदेश दौऱ्यावर विमानाने प्रवास करत असताना, विमान अपघात झाला, काही लोक दगावले, मात्र राणीसाहेबांच्या कडे त्यावेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ होता, त्यांना मात्र कोणतीही इजा झाली नाही, हा प्रसंग भक्तीची शक्ती किती महान आहे, हे दर्शवतो असे प्रतिपादन केले.
प्राचार्य देशमुख सरांनी हा चरित्र ग्रंथ लिहून मालोजीराजे यांच्या चरित्र ग्रंथाचा उत्तरार्धच पूर्ण केला आहे, कारण कोणत्याही पुरुषाच्या कार्याला स्त्रीचा हातभार व परस्पर पूरक विचार महत्वपूर्ण असतात, त्यामुळे राणीसाहेबांच्या चरित्र ग्रंथांमध्ये ही दुसरी बाजू पूर्ण होते, त्यामुळे हा चरित्र ग्रंथ निश्चितच राजघराण्यातील या उभयंतांचा सामाजिक राजकीय दृष्टिकोन स्पष्ट करण्यास प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी आपल्या भाषणामध्ये श्रीमंत मालोजीराजे व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यातील राजकीय संबंधही किती महत्त्वाचे होते, याचे प्रतिपादन केले.
चरित्र ग्रंथाचे लेखक प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी या ग्रंथलेखना पाठीमागचा उद्देश स्पष्ट करताना, आपण राजघराण्यातील आतापर्यंत तीन चरित्र ग्रंथ लिहिलेले असून, हा ग्रंथ लिहिणे हे माझ्या दृष्टीने पूर्णत्वाला जाणे महत्त्वाचे होते, हे कार्य माझ्या हातून घडले याबद्दल मी समाधानी आहे.
अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महिला दिनाच्या दिवशी हा ग्रंथ प्रकाशित होतोय, हा अतिशय दुग्धशर्करा योग असून, आमच्या आजी या अतिशय आधुनिक विचाराच्या होत्या. त्यांच्या माध्यमातूनच पडदा पद्धतीची संस्कृती नष्ट झाली व त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हा आदर्श सामान्य महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे. हे सांगत असतानाच महिला दिनी आपण महिलांचा आदर सत्कार करतो तो वर्षातील प्रत्येक दिवशी करून त्यांना समान न्याय समान वागणूक दिली पाहिजे असे उपस्थितांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. पी.एच कदम यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका गायत्री पवार यांनी केले. या कार्यक्रमाला फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्नमेंट कौन्सिलचे सन्माननीय सदस्य डॉ. राजवैद्य, मा.भोजराज निंबाळकर , प्रशासनाधिकारी प्राचार्य अरविंद निकम तसेच ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ व अरविंद मेहता आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अध्यापिका उर्मिला भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील व विशेष निमंत्रित महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
No comments