Breaking News

साहित्यात गरीब - श्रीमंत हा भेद नसतो - प्राचार्य विश्वासराव देशमुख

There is no distinction between rich and poor in literature - Principal Vishwasrao Deshmukh

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ - साहित्यिक हा जन्माला यावा लागतो, त्याचा जन्म कोठे व्हावा, हे त्याच्या हातात नसते. साहित्यात गरीब - श्रीमंत हा भेद नसतो. मन संवेदनशील होते, तेव्हा साहित्यकृती उदयास येते, साहित्य ही कोणाचीही मक्तेदारी नाही. साहित्यामध्ये  शहरी व ग्रामीण हा भेद न मानता,  जे सुचेल ते मांडता आले पाहिजे, साहित्यिकाला व्यक्त होता आले पाहिजे, त्यासाठी त्याचे वाचन प्रचंड असले पाहिजे. वाचन हे साहित्य संस्कृती समृद्ध करण्याचे प्रभावी माध्यम आहे. अतुल चव्हाण यांचा भयानराती हा कथासंग्रह आपला ठसा उमटवेल असा विश्वास वाटतो आणि  त्यांची प्रत्येक कथा ही आपल्या जवळची वाटते. भयान रातीचे प्रकाशन हे साहित्यिक संवादामध्ये होते, हा दुर्मिळ योगायोग आहे. साहित्यिक संवाद फलटणमध्ये होतो, ही अभिमानाची व दिशा देणारी घटना आहे.  24 वा साहित्यिक संवाद हा फार मोठा टप्पा पूर्ण केलेला आहे. यामध्ये अनेक साहित्यिकांनी भेट देऊन स्वतःला व्यक्त केले आहे व यातून नव्या साहित्यिकांना बळ देण्याचे काम झालेले आहे. फलटणचा साहित्यिक संवाद हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन प्राचार्य विश्वासराव देशमुख यांनी केले.

    मराठी भाषा पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन व 24 वा साहित्यिक संवाद या कार्यक्रमांचे नाना नानी पार्क फलटण येथे  साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण , महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य विश्वासराव देशमुख बोलत होते. याप्रसंगी सर्जाकार व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ, माजी प्राचार्य रवींद्र येवले, साहित्यिक महादेवराव गुंजवटे ॲड. वीरसेन  सोनवणे, प्रा श्रेयश कांबळे  यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लेखक कवी अतुल चव्हाण यांच्या भयान राती या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी  साहित्यिक संवादाचे संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम, लेखक अतुल चव्हाण  यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष व  ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे फलटणचा साहित्यिक संवाद हा आगळावेगळा असून, यामध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळते, त्यामुळेच लेखक अतुल चव्हाण यांच्या भयान राती या कथासंग्रहाचे प्रकाशन आज होत आहे. प्रत्येक साहित्यिकाला फलटणचा साहित्यिक संवाद हा आपल्या जवळचा वाटतो त्यामुळेच दर महिन्याला सर्व साहित्यिक एकवटून अतिशय मुक्तपणे या साहित्यिक संवादामध्ये चर्चा करतात भाग घेतात व आपली मते प्रदर्शित करतात.

    ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ म्हणाले की फलटणचा साहित्यिक संवाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे  98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये याचा नामोल्लेख झाला ही गौरवाची बाब आहे. संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांच्या चिकाटीतूनच हा साहित्यिक संवाद आज पर्यंत टिकून राहिला आहे. तालुक्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील साहित्यिकांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. प्रत्येक महिन्याला नवीन संकल्पना घेऊन साहित्याला नवी दिशा देण्याचे काम ते करतात ही गौरवाची बाब आहे.

    प्राचार्य रवींद्र येवले म्हणाले की भयान रातीचे प्रकाशन हे रात्रीच्या प्रसंगी होते हा दुर्मिळ योगायोग आहे. मराठी भाषा गौरव दिन व अमावस्या हा ही एक योगायोग आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांना बळ देण्याचे काम या साहित्यिक संवादातून होत आहे. अतुल चव्हाण यांच्या हातून अशाच साहित्य कृती निर्माण व्हाव्यात व त्यांचे साहित्य जगभर पसरावे.

    साहित्यिक महादेवराव गुंजवटे, कवयित्री आशाताई दळवी, लेखक अतुल चव्हाण, सुधीर इंगळे, बँक मॅनेजर अमोल अनासाने, श्रेयश कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी करून आत्तापर्यंत झालेल्या 23  साहित्यिक संवाद  कार्यक्रमाचा आढावा घेतला. आपण काय करतोय आणि काय केले पाहिजे यावरही भाष्य केले., कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज. तु. गार्डे यांनी केले तर आभार रानकवी व नियत वनक्षेत्र अधिकारी राहुल निकम यांनी मानले.

    यावेळी हरिराम पवार, हनुमंत मोरे, डॉ. तुषार शिंदे, विकास शिंदे, गणेश तांबे, गणेश शिंदे, काशिनाथ ढेंबरे, महेश ढेंबरे, सचिन जाधव, मंगेश कर्वे तसेच  फलटण तालुक्यातील साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

No comments